Maharashtra rain ; राज्यात दुपानंतर पावसाचा अलर्ट हवामान विभाग.
Maharashtra rain ; राज्यातून नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) जवळपास माघार घेतली असली तरी, पुन्हा एकदा पावसाच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात असून, केवळ गडचिरोलीच्या दक्षिण भागातून त्याची माघार बाकी आहे. मात्र, याच वेळी बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या पूर्वेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती तयार होत आहे. यामुळे आज (दि. १५) दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
येत्या २४ तासांत राज्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह, सोसाट्याचा वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
त्यानंतर अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे, मुंबई आणि नाशिकमधील स्थिती
पुणे, ठाणे, मुंबई, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये विशेष पावसाची शक्यता नाही. मात्र, स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती झाल्यास हलक्या सरी कोसळू शकतात. याव्यतिरिक्त, उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.