शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय ; नुकसान भरपाईची मर्यादा वाढली आणि पीक संरक्षणाचे आवाहन.
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना यापूर्वी केवळ दोन हेक्टरपर्यंत मदत मिळत होती, ती आता वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. वाढीव क्षेत्रासाठी ६४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत राज्यात १,९३९ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
नुकसान भरपाईचे स्वरूप आणि वर्गीकरण
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर ₹१८,५००, बागायतीसाठी ₹२७,०००, तर कायम बागायती/फळझाडांसाठी ₹३२,५०० पर्यंत मदत दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, बियाणे व इतर कामांसाठी ₹१०,००० चा निधी मिळणार आहे. ही मदत दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन दिले असले तरी, तांत्रिक अडचणी आणि ‘गाव पातळीवर अहवाल पुन्हा तयार करण्याचे’ आदेश यामुळे ही मदत केवळ ‘घोषणाच’ ठरू नये, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यानुसार मंजूर निधीची माहिती
या वाढीव मदतीनुसार, विविध विभागांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ३ लाख २७ हजार ७२ शेतकऱ्यांसाठी ३४६ कोटी रुपये, नागपूर विभागात १ लाख ३९ हजार शेतकऱ्यांसाठी ५७.८५ कोटी रुपये, अमरावती विभागात १ लाख ३० हजार ६२५ शेतकऱ्यांसाठी ४६.४७ कोटी रुपये, पुणे विभागात ८,५७८ शेतकऱ्यांसाठी २५.३० लाख रुपये आणि कोकण विभागात १,१३३ शेतकऱ्यांसाठी २ लाख ९६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
















