विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनोत्तर पावसाचा हाहाकार ; ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे मोठे नुकसान.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडा विभागांमध्ये मान्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास संपून दोन आठवडे उलटले असतानाही आलेल्या या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः वेचणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
या पावसाचे नेमके कारण काय?
मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाले होते. या कारणामुळे महाराष्ट्रावर आर्द्रतेचे प्रमाण वाढले आणि काही दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. मात्र, सध्या पडत असलेला पाऊस हा ‘मोंथा’ नावाच्या चक्रीवादळामुळे पडत आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून, त्याला ‘मोंथा’ चक्रीवादळ असे नाव देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ २८ ऑक्टोबर रोजी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले आहे. परिणामी, बंगालच्या उपसागराची किनारपट्टी, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ आणि महाराष्ट्रात या पावसाची तीव्रता अधिक आहे.




















