महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल..हि अट रद्द.
आज शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने’त (Mahadbt Farmer Scheme) एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पूर्वी या योजनेत, ट्रॅक्टर वगळता इतर औजारांसाठी अनुदान घेताना, लाभार्थ्याला किमान तीन औजारे किंवा रुपये एक लाख या रकमेत जेवढी औजारे घेता येतील, त्या मर्यादेत एका वर्षात अनुदान दिले जात होते. तसेच, ज्या औजारासाठी अनुदानाची रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल, त्यासाठी एका वर्षात फक्त एकाच औजारासाठी अनुदान मिळत असे. या अटीमुळे अनेक गरजू शेतकरी पात्र असूनही एकाच वर्षात त्यांना आवश्यक असलेल्या सर्व औजारांचा लाभ घेता येत नव्हता.
१ लाख अनुदानाची मर्यादा रद्द
शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीनुसार, कृषी विभागाने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही अडचण दूर केली आहे. या नवीन पत्रकानुसार, सदर एक लाख रुपये अनुदानाची मर्यादा आता पूर्णपणे काढण्यात येत आहे. याचा अर्थ असा की, आता एका वर्षात लाभार्थ्याची ज्या ज्या घटकासाठी निवड झाली आहे, त्या सर्व घटकासाठी अनुदान अनुदेय राहणार आहे.
शेतकऱ्याला आता हवे असलेले कोणतेही कृषी अवजार घेता येणार आहे आणि त्यासाठी अनुदानाची रक्कम मर्यादा ठरणार नाही. मात्र, एकाच घटकासाठी अनुदानाचा लाभ पुन्हा मिळणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.